परभणी - कॉंग्रेस आघाडी व युतीसह अन्य राजकीय पक्षांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यातील शेतीविषयक मुद्दे हे शेतकरी संघटनेच्या १९८० मधील भाषणांची कॉपीच आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद जोशी यांनी बुधवारी (ता. सात) जाहीर सभेतून केला.
परभणी विधानसभा मतदारसंघातील स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार वसंत हरकळ यांच्या प्रचारासाठी येथील नटराज रंगमंदिरात आयोजित सभेत श्री. जोशी बोलत होते. ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, ऍड. अनंतराव उमरीकर, गोविंद जोशी, पुरुषोत्तम लाहोटी, वैजनाथ रसाळ, रईस शेख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. श्री. जोशी म्हणाले, "जाहीरनाम्यांच्या बाबतीत सर्वच पक्षांनी शेतकरी संघटनेच्या १९८० मधील भाषणांच्याच मुद्द्यांची कॉपी केली आहे. संघटनेने त्यावेळी मांडलेला शेतीमालाच्या भावाचा मुद्दा जशास तसा उचलला आहे. कर्जमुक्तीबाबतही कॉंग्रेसने अशीच भूमिका घेतली आहे. इतकी वर्षे न सुचणारे मुद्दे आता कॉंग्रेस मांडत आहे. जागतिक मंदी व आतंकवादासारख्या मोठ्या प्रश्नांना तोंड द्यायचे आहे. आम आदमीचे भले करण्याऐवजी देशाच्या विकासासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे "पोशिंद्याची लोकशाही आणि समर्थ भारत' असा जाहीरनामा घेऊन पक्ष रिंगणात उतरला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच ज्यांच्यासोबत आपण राहिलो, त्या शिवसेना-भाजप युतीनेही घोर निराशा केली आहे.'' शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतीमालाला मिळत असलेले कमी भाव यांचा उल्लेख करून गुणवंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्याला वाचवायचे असेल, शेतीची अर्थव्यवस्था टिकवायची असेल तर आमच्या पक्षाला निवडून द्यावे. उमेदवार श्री. हरकळ यांनी भूमिका मांडली. जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शेतीसाठी ५० टक्के तरतूद आवश्यक - अंदाजपत्रकातील ८० टक्के रक्कम ही प्रशासकीय बाबींवर खर्च केली जाते. त्यामुळे सरकारी खर्च १८ टक्क्यांवर आणून शेतीसाठी ५० टक्के खर्चाची तरतूद केली जाणे गरजेचे आहे, असे मतही श्री. जोशी यांनी व्यक्त केले. |
ऍग्रोवनचा राजकडून दाखला"एफडीए'चा निर्णय लागू झाल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होणार असल्याचा दाखला देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "ऍग्रोवन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या शेतकरी नेते शरद जोशी यांच्या मुलाखतीचा दाखला दिला. "ऍग्रोवन'मधील मुलाखतच त्यांनी वाचून दाखवली. त्यामध्ये कृषी बाजार समितीच्या माध्यमातून विकासच झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment